कोणत्याही गावातील लोकांचा ग्रामपंचायत हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण ग्रामपंचायत हे त्यांना मदत करणारे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे हक्काचे व्यासपीठ असते. गावात राहणाऱ्या कित्येक लोकांना विशेषतः महिलांना ग्रामपंचायत ही ग्रामसभा आणि निवडणुकांपुरतीच माहीत असते. अशा लोकांसाठी देत आहोत ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती.
गेल्या काही वर्षांत गावागावांमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू झाले. निर्मल ग्राम योजनेंतर्गत गावेच्या गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न झाला. आदर्श अशा योजना या गावांमध्ये राबवल्या गेल्या. काही गावांतील बचतगटांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला. आपण जर नव्याने आदर्श म्हणून समोर आलेली गावे पाहिली तर एक गोष्ट लक्षात येईल.
ती म्हणजे या गावांमध्ये ग्रामसुधारणेसाठी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजेच ग्रामपंचायतीचे चांगलेच पाठबळ मिळाले. ज्या गावांमधील ग्रामपंचायती सक्षम आहेत. तसेच ग्रामसेवक, सरपंच तडफदार आहेत अशा गावांनी देशाच्या पातळीवर चांगलेच नाव मिळवले आणि शाबासकीही. काही गावांमधील ग्रामपंचायती, तिथले सदस्य गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, ग्रामस्वच्छतेसाठी मनापासून काम करत आहेत. गावात विजेची बचत व्हावी, अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी झटून प्रयत्न करताना दिसत आहेत. माणूस म्हटले, की व्यक्तिगत हेवेदावे आलेच आणि कोणताही सरपंच कुठल्या ना कुठल्या पक्षाचा असतोच.
पण अशा परिस्थितीतही ग्रामविकासाच्या कार्यात व्यक्तिगत हेवेदावे आणि पक्षीय राजकारण न आणणारे काही आदर्श सरपंच आहेत, त्यांच्यामुळेच तर त्यांची गावे आदर्श ठरत आहेत. दुष्काळी गावात पाणलोट क्षेत्र विकासाचे महत्त्व ओळखून लोकांना त्या कामासाठी सहभागी करून घेणे, गावाच्या बकालीकरणावर मात करून सामाजिक वनीकरणासारखे प्रकल्प राबवणे, गावातील लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, प्रत्येक मूल शाळेत गेलेच पाहिजे ही भूमिका घेऊन शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणे, गावातील सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक स्वच्छतेचाही पुरस्कार करणे हे आणि असे अनेक प्रकल्प राबवणारी ग्रामपंचायत आदर्श ठरते. खरे तर गाव म्हटले, की गटातटाचे राजकारण, पदामुळे होणारा लाभ या गोष्टी अपरिहार्य असतात. बऱ्याचदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकींमुळे गावात दोन किंवा तीन तट पडतात आणि एखादे गाव एकीच्या दृष्टीने विस्कळित झाले, की ते सावरणे फार कठीण असते.
गावातील लोक एकजुटीने बरीच विकासात्मक कामे करू शकतात, पण आपण पाहिले तर हे लक्षात येते की, कोणतेही बकाल गाव सामाजिक आणि मानसिक दृष्टीनेही विस्कळित झालेले असते. अशा वेळी गावाला एकसंध बांधण्याचे आणि गावकऱ्यांच्या मनात "एक गाव एक कुटुंब' ही संकल्पना राबवण्याचे काम फक्त गावातील ग्रामपंचायतच करू शकते. म्हणूनच ग्रामपंचायतीसारखा महत्त्वाचा आणि खेडेगावांच्या दृष्टीने अपरिहार्य असा विषय सदर रूपाने "ऍग्रोवन'मधून वाचायला मिळेल.
Monday, March 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment